जळगाव/ उद्या नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीत मतदान करण्यासाठी खाजगी आणि सरकारी आस्थापनातील कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे.असा आदेश प्रशासनाने काढला असून हा आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचाराने जोर धरला असून शेवटच्या दोन दिवसांवर ही निवडणूक आली आहे. तब्बल ९ वर्षानंतर बहुतांश नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे, प्रत्येक नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच, यंदा निवडणुकीत मतदान करुन लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं योगदान देणं बंधनकार आहे. त्याच, पार्श्वभूमीवर येत्या 2 डिसेंबर २०२५ रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून कामगारांना मतदानाच्या दिवशी पगारी रजा देण्याचे बजावले आहे. तसेच, कामगारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहन केलंय.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर, अमळनेर, भुसावळ, भडगाव, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदुर्णी, वरणगाव, यावल इत्यादी नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२५(बी) अन्वये मतदानाच्या दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. मागील निवडणुकांत काही आस्थापनांनी सुट्टी न दिल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यामुळे यंदा विशेष खबरदारी घेत, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, दुकाने, कारखाने, हॉटेल्स, मॉल्स, आयटी कंपन्या, व्यापारी प्रतिष्ठाने आदींना हे आदेश लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.अत्यावश्यक व अविरत सेवांमध्ये सुट्टी देणे शक्य नसल्यास कर्मचारी व कामगारांना 2 ते 3 तासांची विशेष सवलत देऊन मतदानाचा हक्क बजावता येईल, याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाने निर्देश दिले आहेत. मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास आणि त्यामुळे मतदार वंचित राहिल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे

