रत्नागिरी, : कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त साजर्या करण्यात आलेल्या २६ व्या कबड्डी दिनाने रत्नागिरीत कबड्डीचा खर्या अर्थाने कौटुंबिक मेळावा रंगवला. राज्याच्या कानाकोपर्यातून आलेले शेकडो माजी-विद्यमान खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, कार्यकर्ते आणि कबड्डीप्रेमींनी देसाई बँक्वेट हॉल गजबजून गेले. अनेक वर्षांनी एकमेकांना भेटलेल्या कबड्डीच्या वारकर्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने हा सोहळा संस्मरणीय आणि भावनिक ठरला.
राज्य कबड्डी संघटनेने यंदाच्या कबड्डी दिनाचे आयोजन करण्याची संधी रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघटनेला दिली होती. जिल्हा संघटनेने या संधीचे सोने करत राज्यभर विखुरलेल्या कबड्डी परिवाराला एकाच छताखाली आणले. देश-विदेशात महाराष्ट्राचे नाव उंचावणार्या खेळाडूंचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यामुळे हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता न राहता कबड्डी परिवाराच्या पुनर्भेटीचा संस्मरणीय उत्सवही ठरला. याप्रसंगी राज्यातील ज्येष्ठ कबड्डी संघटक दिनकर पाटील आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कबड्डीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने रोखठोक बातमीदारी करणारे दै. सामनाचे क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर तसेच दै. सकाळचे अलताफ कडकाले यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले.
या सोहळ्यात राज्यभरातील ६० हून अधिक कबड्डी संघटक, खेळाडू आणि कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून आत्माराम घेगडे, बंडू कांबळे, भरत मुळे, गिरीश नाईक, डॉ. दत्तात्रय शिंपी, वल्केश राऊत, खंडबाराव नाईक, प्रकाश पाटील, सय्यद अजगर अली पटेल आणि विलास सावंत यांचा गौरव करण्यात आला. मुंबईचे शशिकांत कोरगावकर यांना ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे त्यांची नात सेरेना म्हसकरलाही शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले. बंड्या मारुती सेवा मंडळाच्या माध्यमातून अखिल भारतीय दर्जाच्या कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणारे निवृत्ती देसाई यांना कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सोपान काकडे, सदानंद जोशी आणि अभिजित राणे यांचाही गौरव करण्यात आला
यावेळी उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष उदय सामंत यांनी राज्यातील सर्व जिल्हा कबड्डी संघटनांना कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून पुढील दोन महिन्यांत प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष गजानन किर्तीकर, उपाध्यक्ष भाई जगताप, सरकार्यवाह माधव गायकवाड आणि खजिनदार मंगल पांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कबड्डीच्या भूतकाळाचा गौरव, वर्तमानाचा सन्मान आणि भविष्याची आश्वासने अशा त्रिवेणी संगमाने सजलेल्या या सोहळ्याने रत्नागिरीतील कबड्डी दिन राज्य कबड्डीच्या इतिहासातील संस्मरणीय पर्व ठरवला.
राष्ट्रीय विजेतेपद मिळवा… प्रत्येक खेळाडूला १ लाख
यंदाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र राज्यातील खेळाडूंनी अधिक जोमाने तयारी करून महाराष्ट्राला पुन्हा राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवून द्यावे, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. महाराष्ट्राचा संघ राष्ट्रीय विजेता ठरल्यास त्या संघातील प्रत्येक खेळाडूला वैयक्तिकरित्या एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली. या घोषणेमुळे उपस्थित खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

