मुंबई/ राजकारणात कधी कधी लवचिक भूमिका घ्यावी लागते या राज ठाकरेंच्या पोस्टमुळे मुंबई महापालिकेत महापौर पदाच्या निवडणुकीत काय घडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.जे डोंबिवलीत घडले ते जर मुंबई महापालिकेत घडले तर मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना अभिवादन करणारी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये राज यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. राज यांनी बाळासाहेबांच्या भूमिकांबाबत भाष्य करताना त्यांनी कधीही मराठीच्या मुद्यावर तडजोड केली नसल्याकडे लक्ष वेधले आहे. राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
राज यांच्या या वक्तव्याने आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे लढवल्या. सत्ता काबीज करण्यास ठाकरे बंधूंना अपयश आले. तर, मनसेचे अवघे ६ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर आता राज ठाकरे हे कल्याण-डोंबिवलीनंतर मुंबईतही पाठिंबा देण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. अशातच राज ठाकरे यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे
. बाळासाहेबांची आज १०० वी जयंती. इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी, आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत रहावं हे दुर्मिळ. हे फक्त बहुदा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं. आणि म्हणूनच बाळासाहेब १०० वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेंव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा.आज निष्ठा सहज विकल्या जातात. तत्व सहज फेकून दिली जातात, आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे. आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक, भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर मोजलं जातं. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फूटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं . सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोकं टाकू शकतात हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा.असेही ते म्हणाले आहेत राज ठाकरे यांनी लवचिक भूमिकेचा माध्यमातून कल्याण डोंबिवलीत घडलेल्या राजकीय समीकरणाचे अप्रत्यक्ष समर्थनच केले आहे त्यांची ही भूमिका म्हणजे मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचे संकेत समजले जात आहे

