मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर आज राज व उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एका व्यासपीठावर आले .यावेळी मंचावर ठाकरे बंधूंची आजपर्यंत न पाहिलेली केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. यावेळी राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. भाषण करताना आज राज ठाकरेंनी पहिल्यांदाच पक्ष सोडताना त्यांची जी भावना होती, ती भर सभेत बोलून दाखवली. ज्यावेळी मी बाहेर पडलो त्या वेदना वेगळ्या होत्या, माझ्यासाठी तो पक्ष सोडणे नाही तर घर सोडणे होते, असे म्हणत पहिल्यांदाचा आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी राज ठाकरेंचे शब्द ऐकून उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या डोळ्याच पाणी आले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी राज ठाकरे बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, आज जे काही सुरू आहे ते पाहता असे वाटते की बाळासाहेब नाहीत ते बरे आहे. महाराष्ट्राचे राजकारण सध्या गुलामांचा बाजार आहे. महाराष्ट्रात माणसांचे लिलाव सुरू आहेत. कल्याण डोंबिवली येथील राजकारण पाहून शिसारी आली. किती त्रास झाला असता त्यांना हे सर्व बघून… महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते बाळासाहेब कधीच पाहू शकले नसते.गेल्या काही वर्षात अनेक गोष्टी मला उमजल्या, उद्धवला ही उमजल्या असतील. जे काही झाले ते विसरून जा. गेल्या 20 वर्षात जे झालं ते आता सोडून द्या. 20 वर्षात मला आणि उद्धवला अनेक गोष्टी उमजल्या आहेत. तो माणूस कसा होता हे जगाला माहिती नाही, ते विलक्षण होते, असे म्हणत शिवसेना सोडण्यावर राज ठाकरेंनी पहिल्यांदा भाष्य केले.२००५ साली मी पक्ष सोडला आणि साल २००६…जानेवारी महिन्यात मी राज्यव्यापी दौन्यावर निघालो प्रवासात असताना मोबाईल वाजला… मी फोन घेतला, पलीकडून आवाज आला, ‘बरा आहेस ना रे…?’ बाळासाहेब काळजीच्या स्वरात विचारत होते. मी हो म्हटलं. ‘कुठे लागलं नाही ना?’ लगेच पुढचा प्रश्न आला. खरं तर, आमच्या गाडीला ट्रकची धडक बसणार होती, पण तसं झालं नाही. आम्ही बचावलो, सुखरूप होतो, पण बातमी ‘मातोश्री’ पर्यंत गेली होती. म्हणूनच काकाच्या आवाजात काळजी होतीलहान असताना उकळतं पाणी अंगावर पडून भाजलो होतो ते दिवस आठवतात. मी तेव्हा ‘मातोश्री’वरच राहायला होतो. औषधं सुरू होती. मानेवर, पाठीवर फोड आले होते. तेव्हा रोज सकाळी बादलीभर पाणी, कापूस, डेटॉल घेऊन काका माझ्याबरोबर बसायचा. जखमा डेटॉलने धुऊन काढायचा. दोन महिने अशी माझी शुश्रूषा त्याने केली. मी जेव्हा वेगळी राजकीय चूल मांडली तेव्हा मला सर्वात जास्त त्रास एकाच गोष्टीचा होत होता, की माझ्या माणसांना आता पूर्वीसारखं मला भेटता येणार नाही. वडिलांचं छत्र हरपलं होतं आणि आता मी माझ्या काकापासून पण दूर गेलोय, हाच विचार मनाला खात होता. पक्षातून बाहेर पडणं, यापेक्षा माझं घरातून बाहेर पडणं, त्याच दु:ख जास्त होतं.बाळासाहेब केशव ठाकरे…माझा काका…माझं बालपण, तरुणपण त्याने व्यापलं होतं. तो माझ्यासाठी नेहमी पहाडासारखा उभा राहिला.असेही ते म्हणाले

