मुंबई/महापालिका निवडणुकानंतर आता जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप महायुतीचा बिनविरोध पॅटर्न पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे तब्बल ११ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामध्ये, भाजपचे १० आणि शिंदेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार बिनविरोध आहे. जिल्हा परिषद गटातून ५उमेदवार बिनविरोध असून ६ उमेदवार पंचायत समिती गणातून बिनविरोध आहेत. त्यामुळे, महायुतीने महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेतही बिनविरोध पॅटर्न कायम ठेवल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग हा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचाच मूळ जिल्हा आहे.
जिल्हा परिषद निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया संपुष्टात येत असून अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे, अपक्ष उमेदवारांकडून अर्ज मागे घेतले जात असून काही विरोधी पक्षातील उमेदवारही नांग्या टाकत आहेत. त्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 5 आणि पंचायत समितीत एकूण 6 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामध्ये, जिल्हा परिषद गटात भाजपचे ४आणि शिंदेंच्या शिवसेनेचा एक उमेदवार बिनविरोध आहे. तर, पंचायत समितीमध्ये ६ही उमेदवार भाजपचे आहेत.
खासदार नारायण राणे यांच्या आणि मंत्री नितेश राणे यांच्या प्रत्यक्ष व्यूहरचनेमुळे जिल्ह्यातील अनेक जागांवर विरोधकांनी आपली उमेदवारी मागे घेतली. विशेषतः कणकवली मतदारसंघात राणे यांचा मोठा प्रभाव पाहायला मिळत आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत २७ जानेवारी असल्याने, शेवटच्या टप्प्यात पालकमंत्री विरोधकांना आणखीन काही धक्के देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा विजय म्हणजे जनतेचा राणे कुटुंबीयांवरील विश्वास आणि महायुतीच्या कामाची पावती आहे. उरलेल्या ४५ जागांवरही आमचा करिष्मा कायम राहील, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

