मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या प्रवक्ते पदासाठी नवी यादी जाहीर केली असून १७ नावांच्या या यादीतून आमदार अमोल मिटकरी आणि पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे यांची नावे गायब आहेत. त्यामुळे, या दोन्ही प्रवक्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसने हकालपट्टी केल्याचं दिसून येत आहे. आता, पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यानुसार, लवकरच भूमिका मांडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आता, अमोल मिटकरी यांनी एका शायरीतून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयम ठेवणाऱ्यांनाच ध्येय गाठता येतं, असा अर्थ त्यांच्या शायरीतून दिसून येत आहे.
अमोल मिटकरी यांची सोशल मीडियावरील भूमिका काहीवेळा पक्षासाठी व महायुतीसाठी अडचणीची ठरल्याने त्यांना आपल्या भूमिकेतून माघारही घ्यावी लागली आहे. तर, फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणावरुन रुपाली ठोंबरे यांनी आपल्याच पक्षाच्या रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होतीत्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार यांचीही भेट घेतली होती. ही भेट होऊन काही तास उलटत नाही तोच रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय, वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांना देखील प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले आहे. अमोल मिटकरी यांनी शायरीतील दोन ओळीतून आपली भूमिका मांडली आहे. ट्विटरवरुन त्यांनी शायरी शेअर करत धावणारांच्या या जगात संयम ठेऊन पुढे जाणाऱ्यांनाच ध्येय गाठता येतं, असे मिटकरी यांनी सूचवलं आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून काम करताना केलेल्या काही वक्तव्यांवरुन आणि सोशल मीडियातील भूमिकांवरुन वाद झाला होता. त्यामध्ये, अलिकडेच आयपीएस अंजना कृष्णा यांच्या जातपडताळणीची मागणी करणारे ट्विट केलं होतं, ते पक्षाच्या दबावामुळे त्यांना डिलीट करावं लागलं. तसेच, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात पाठिंबा दर्शवणारे ट्विट केलं आणि पक्षातून नाराजी व्यक्त केल्यानंतर तेही ट्विट त्यांनी डिलीट केलं आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मिडियाचं मॅनेजमेंट करणाऱ्या डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून आपणच निवडणूक जिंकून आणली अशा प्रकारे ट्विट लिहिलं आहे, असं आक्षेप घेणारे ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं होतं. त्यावरून वादंग निर्माण झाला होता. याशिवाय, महायुतीमधे असताना आपण रावणाचं मंदिर बांधणार असल्याची घोषणा अमोल मिटकरी यांनी केली होती, त्यावरूनही महायुतीमध्ये वाद निर्माण झाला होता. तर, अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यावरून भाजपला सवाल विचारणारे ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं होतं.दरम्यान, अमोल मिटकरी यांच्या अशा भूमिकांमुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडत होती. विशेष म्हणजे भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाव न घेता वाचाळवीरांना पक्ष नेतृत्वाने समज द्यावी, पक्ष नेतृत्वाचे त्यांनी ऐकावे, असे म्हणत एकप्रकारे मिटकरींनाच सल्ला दिला होता.

