महाराष्ट्रातील दुकाने हॉटेल्स यापुढे २४ तास उघडी राहणार – बार व दारू दुकानांना वगळले
मुंबई/ सणासुदीच्या काळात व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना २४ तास उघडी ठेवता येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडून यासंबंधित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.मद्यपान गृहे, बार, परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार यांसारख्या आस्थापनांना वगळता इतर सर्व आस्थापना, खाद्यगृहं आणि दुकाने आता २४ तास सुरू राहणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील व्यापारी व्यवहारांना नवे बळ मिळणार आहे आणि ग्राहकांना दिवस-रात्र सेवा उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम, २०१७ च्या कलम १६ (१) (ख) नुसार, कोणतीही आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस सुरू ठेवता येईल. मात्र, प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून एकदा सलग २४ तासांची साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक राहील. तसेच कलम २(२) मध्ये ‘दिवस’ याची व्याख्या मध्यरात्रीपासून सुरू होणारा २४ तासांचा कालावधी अशी करण्यात आली.दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम, कलम ११ नुसार, राज्य सरकारला विविध क्षेत्रांसाठी किंवा आस्थापनांच्या वेगवेगळ्या वर्गांसाठी सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्याचा अधिकार आहे. शासनाने १९ डिसेंबर २०१७ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार, परमिट रूम, बिअर बार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक, तसेच वाईन आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकाने यांच्याच वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. नंतर ३१ जुलै २०१९ रोजी थिएटर आणि सिनेमा गृहांना या यादीतून वगळण्यात आले.