मुंबई/राज्यातील महानगरपालिका निवडणुकांनंतर आता सर्वाधिक लक्ष मुंबई महापालिकेच्या महापौरपदाकडे लागले आहे. मुंबईसारख्या देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावी महापालिकेचा कारभार कोणाच्या हाती जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, येत्या 11 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या नव्या महापौरपदासाठी मतदान होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या निवडीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून, राजकीय पातळीवरही हालचालींना वेग आला आहे.या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीनंतरही मुंबई महापालिकेवर भाजपचं वर्चस्व कायम राहिलं आहे. त्यामुळे महापौरपद कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. आता 11 फेब्रुवारीला मतदान होणार असल्याने मुंबईकरांना लवकरच नवा महापौर मिळणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या महापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व नियमांची पूर्तता करत 11 फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी मतदान होईल. त्याच दिवशी निकाल जाहीर होऊन मुंबईला नवा महापौर मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते. हा निर्णय राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असल्यामुळे महापौरपदाबाबत अंतिम चर्चा काही काळ रखडली होती. मात्र, फडणवीस मुंबईत परतल्यानंतर भाजप आणि शिंदे गटामध्ये बैठका झाल्या असून, त्यातून महापौर निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

