पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील शिवपूर परिसरात टीएमसी नेता शमीम अहमद यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर भूमिगत आलिशान खोल्यांचे जाळे उघडकीस आले. साध्या दिसणाऱ्या घराखाली गुप्तपणे भव्य तहखाना तयार करण्यात आला होता, ज्यामध्ये महागडी फर्निचर, पलंग, सीसीटीव्ही कॅमेरे, आधुनिक स्वयंपाकघर आणि इतर सुविधा आढळल्याने पोलिसही थक्क झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, रामनवमीच्या मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आणि भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्बहल्ल्याच्या आरोपांप्रकरणी शमीम अहमद यांचा शोध सुरू होता. याच प्रकरणांमध्ये त्यांना पकडण्यासाठी पोलिस त्यांच्या घरी गेले असता, घर बाहेरून सर्वसामान्य दिसत होते. मात्र तपासादरम्यान जिन्याच्या शेजारी खाली जाणारा मार्ग आढळला आणि पोलिसांनी तहखान्यात प्रवेश केला. तेथे दोन आलिशान पलंग, निगराणी यंत्रणा, अनेक सोफे, महागडे फर्निचर आणि पूर्णपणे सुसज्ज स्वयंपाकघर असे सर्व काही आढळले. दरम्यान, पोलिस पोहोचेपर्यंत शमीम अहमद फरार झाल्याची माहिती समोर आली.
शमीम अहमद यांच्या पत्नी या परिसरातील माजी नगरसेविका राहिल्या असून, हे घर हावड्यातील शिवपूर परिसरात असल्याचे समजते. रामनवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचार प्रकरणात शमीम अहमद यांना यापूर्वी एनआयएने अटकही केली होती, मात्र नंतर ते जामिनावर बाहेर आले होते, अशीही माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील नगरपालिकांच्या भरती घोटाळा प्रकरणात ईडीने टीएमसीचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री सुजीत बोस यांना अटक केली. कोलकात्यातील ईडी कार्यालयात त्यांची जवळपास दहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ईडीचा आरोप आहे की, दमदम नगरपालिकेसह अनेक नगरपालिका संस्थांमध्ये भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असून, सुजीत बोस यांनी सुमारे दीडशे जणांना बेकायदेशीर पद्धतीने नोकऱ्या मिळवून देण्यासाठी पैसे आणि फ्लॅट्स घेतले.
या प्रकरणात गौतम नावाच्या व्यक्तीमार्फत आर्थिक व्यवहार होत असल्याचेही ईडीने म्हटले असून, त्याच्याकडे झालेल्या छाप्यात सुमारे तीन कोटी रुपये सापडल्याचा दावा आहे. २०१४ पासून अनेक नगरपालिकांमध्ये पैसे घेऊन नोकऱ्या वाटप झाल्या, आणि त्या काळात सुजीत बोस दमदम नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते, असा ईडीचा आरोप आहे.
विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यानही सुजीत बोस यांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली होती; मात्र प्रचारात व्यस्त असल्याचे कारण देत ते चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यांच्या अटकेनंतर भाजपने टीएमसी सरकारवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची पुनरावृत्ती करत निशाणा साधला आहे.
सुजीत बोस हे टीएमसीचे महत्त्वाचे नेते मानले जातात. ममता बनर्जी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद भूषवले असून, विधाननगर मतदारसंघातून ते तीन वेळा आमदारही राहिले आहेत.

