मुंबई महापालिकेतील (BMC) शहर अभियंता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेसाठी राजकीय नेत्यांकडून आलेल्या शिफारशींची एक यादी समोर आल्याने प्रशासकीय व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरटीआयच्या (RTI) माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ अभियंत्यांपासून ते सहाय्यक व कार्यकारी अभियंत्यांपर्यंत तब्बल २२५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी सत्ताधारी महायुतीतील बड्या नेत्यांची शिफारस पत्रे जोडण्यात आली आहेत.
या यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा सर्वाधिक (१० वेळा) उल्लेख असून, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (९ वेळा), मंत्री गिरीश महाजन आणि आमदार कालिदास कोळंबकर (प्रत्येकी ७ वेळा) यांची नावे अग्रस्थानी आहेत. याशिवाय भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या अनेक मंत्री व आमदारांनीही आपल्या पसंतीच्या अधिकाऱ्यांसाठी पत्रे दिल्याचे उघड झाले आहे.
या घटनेमुळे बीएमसीच्या बदली प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बदल्या नियमांनुसार होतात की राजकीय दबावाखाली, असा सवाल विरोधकांनी केला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. “दररोज मोठ्या संख्येने नागरिक कामांसाठी येतात, त्यामुळे शिफारस पत्रे जाणे स्वाभाविक आहे. शिफारस केली म्हणजे बदली झालीच असा अर्थ होत नसून, प्रशासनाने नियमांनुसार चौकशी करूनच योग्य निर्णय घ्यावा,” असे स्पष्ट करण्यात आले आहे.
