मुंबई : मुलुंड मेट्रोचा स्लॅब पडून झालेल्या अपघात प्रकरणात आता कारवाईला जोर आला असून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच मिलन रोड बिल्डटेक या रिलायन्स अस्तालदी कंपनीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डेप्ट्युटी मॅनेजर सौरभ सिंह, सुपरवायर प्रशांत भोईर आणि अवधूत इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवधुत इनामदार हे डीबी हिल एलबीजी कंपनीशी सबंधित असल्याची माहिती आहे. मुलुंड दुर्घटनेला जबाबदार धरत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सत्यजीत साळवे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तसे आदेशच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. मेट्रो ब्रीज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करावं असे निर्देश एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. मेट्रो मार्गाचं बांधकाम करणाऱ्या लुई बर्गर कंपनीला एक कोटींचा दंड तर अपघाताला जबाबदार असणाऱ्या मिलन इंफ्रा कंपनीला पाच कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर एमएमआरडीएकडून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना १५ लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुलुंडमध्ये एलबीएस रोडवर वडाळा ते कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत. तसंच तीन वाहनं स्लॅबखाली दबली गेली. रामधन यादव असं मृत व्यक्तीचं नाव असून ते उत्तर प्रदेशचा रहिवासी होते. मुंबई फिरण्यासाठी आले असता त्यांचा अपघाती मृत्यू झाला. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावेळी हा स्लॅब कोसळला. एलबीएस रोडवरून ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक या अपघातानंतर बंद करण्यात आली होती. एमएमआरडीए या संपूर्ण मेट्रो मार्गाचं बांधकाम करत आहे. वेगवेगळ्या चार टप्प्यांचे चार वेगवेगळे कंत्राटदार आहेत.
ज्या टप्प्यात हा अपघात झाला तिथलं बांधकाम टाटा प्रोजेक्टस लिमिटेड आणि चायना हार्बर इंजिनिअरिंग कंपनीकडे आहे. दरम्यान, या अपघातानंतर बंद करण्यात आलेला एलबीएस मार्ग तब्बल ७ तासांनी पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून मुलुंड पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दुर्दैवाने, या घटनेत मुंबई फिरण्यासाठी आलेले उत्तर प्रदेशातील रामधन यादव यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. रामधन यादव हे उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील एका गावाचे सरपंच म्हणून काम पाहत होते. ते मित्रासोबत मुंबई फिरण्यासाठी आले होते. कळव्यात एका लग्नासाठी रामधन यादव आणि महेंद्र यादव रिक्षानं निघाले होते. त्याचवेळी मेट्रोचा सिमेंट ब्लॉक रिक्षावर कोसळला.

