मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागा लवकरच रिक्त होणार असून, त्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत राज्यातील राजकीय समीकरणे बदललेली दिसणार आहेत. सध्याच्या विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट फायदा होण्याची शक्यता असून, महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. २ एप्रिल रोजी राज्यातून निवडून गेलेले सात राज्यसभा खासदार निवृत्त होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे डॉ. भागवत कराड आणि धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या फौजिया खान यांचा समावेश आहे. या सर्वांची मुदत संपल्यानंतर तातडीने नव्या निवडणुका होणार आहेत
२०२० मध्ये या सात जागांसाठी निवडणूक झाली होती, तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या काळात विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर महाविकास आघाडीने चार जागा जिंकल्या होत्या. मात्र, सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. सत्तांतरानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आमदारसंख्येचे गणित मोठ्या प्रमाणात ढासळले आहे. विधानसभेतील बदललेल्या आकड्यांमुळे महाविकास आघाडीला यावेळी चार जागा मिळवणे शक्य नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. उपलब्ध संख्याबळ पाहता, आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागू शकते. दुसरीकडे, भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांची ताकद वाढल्याने बहुतेक जागांवर त्यांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभेची ही निवडणूक केवळ जागांची नसून, ती राज्यातील बदललेल्या राजकीय शक्तिसमीकरणांचे प्रतिबिंब मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सत्ताधारी तसेच विरोधकांचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील काही दिवसांत उमेदवारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

