मुंबई/शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अलिकडेच महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडल्या. यात दोन्ही पक्षांना चांगले यश मिळाले. मात्र आता निवडणूक संपल्यानंतर गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. पक्षाने परवानगी दिली तर त्यांचे नामोनिशान मिटवून टाकेन असं नाईक यांनी म्हटले आहे. आता एकनाथ शिंदे काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. गणेश नाईक नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
ठाण्यातील महागणपती मंडळाला गणेश नाईक यांनी आज भेट दिली. यावेळी बोलताना गणेश नाईक म्हणाले की, ‘सातत्याने मी तीन वर्षापासून या ठिकाणी येतोय. त्यामुळे नवसाचा गणपती म्हणायला हरकत नाही कारण याची फळ मिळायला लागली आहेत.’ महापौर पदावर बोलताना नाईक म्हणाले की, ‘मी माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या की ठाणे जिल्ह्यासह एमएमआरडीए परिसरामध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना नेत्या लोकांची खासदारकी असते, आमदारकी असते. पण महापालिका आणि नगरपालिका ही कार्यकर्त्यांची असते. एकदा त्यांना लढू द्या लढल्यानंतर त्यांना पुन्हा ज्याचे नगरसेवक जास्त त्याचा महापौर करू त्याला दुसरा पक्षांनी पाठिंबा द्या. काही ठिकाणी दुर्दैवाने ती संधी मिळाली नाही.बोलताना गणेश नाईक म्हणाले की, ठाण्यामध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाच्या घोड्यांची लगाम खेचली गेली. कल्याण मध्ये सुद्धा लगाम खेचली गेली पण आता ठीक आहे. अखिल भारतीय पक्ष भाजपा आहे, पक्षाला जे अभिप्रेत आहे ते देशामध्ये, राज्यामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हावं. भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे, आदेश आला की तो पाळला जातो मग कोणाच्या मनात इच्छा असो वा नसो. ठाण्याला, कल्याणला आणि उल्हासनगरला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची परवड झाली. माझ्या सारख्याने नाही बोलायचं मग कोणी बोलायचं? याचा अर्थ तरी सुद्धा कार्यकर्त्यांनी शिस्त पाळली त्या कार्यकर्त्यांचा कौतुक आहे.

