मुंबई/आगामी मुंबई महानगरपालिकेच्या २२७ वॉर्डांपैकी १५०जागांवर महायुतीत एकमत झाले असून उर्वरित ७७ जागांबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे म्हणत असले, तरी शिवसेनेच्या बालेकिल्यावर भाजपची नजर आहे. शिवसेना भाजपची युतीची चर्चा जरी होत असली, तरी शिवसेनकडून २२७ जागांवर मुलाखती घेतल्या जात आहेत. यावरून भाजपकडून दगा फटका झाल्यास स्वतंत्र लढण्याबाबतही शिवसेना चाचपणी करत असल्याचे दिसून येते.
युतीची चर्चा जरी होत असली तरी शिवसेनेच्या अनेक बालेकिल्ल्यावर भाजपची नजर आहे. शिवसेनेच्या या जागा स्वत:कडे घेण्यासाठी भाजप आग्रही असताना, या जागांबाबत तडजोड करू नये, अशी मागणी शिवसेना नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे स्वतंत्र लढण्यासाठी शिंदे यांच्यावर शिवसेना नेत्यांकडून दबाव आणला जात आहे. काल संयुक्त पत्रकार परिषदेत १५० जागांवर सकारात्मक चर्चा झाली असली तरी ७७ जागांवर रस्सी खेच होण्याची शक्यता आहे. या ७७ जागांमध्ये शिवसेनेचे काही वाॅर्ड आहेत त्यावर भाजपकडूनही दावा केला जात आहे. इच्छुकांच्या मुलाखतीमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी आपण स्वतंत्र निवडणूक लढायला हवी अशी इच्छाही मुलाखत घेणाऱ्या नेत्यांजवळ अनेकानी बोलून दाखवली. दुसरीकडे, उर्वरित ७७ जागांबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या चर्चेचा निकाल लागेल, अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी दिली. साटम म्हणाले की, उर्वरित जागांवर अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमताने घेतील. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा निर्धार महायुतीचा असून मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकजुटीने काम करत आहेत.कोण किती जागा लढणार यापेक्षा महायुती २२७ही जागा लढवेल आणि १५० पेक्षा अधिक जागा जिंकून महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा विश्वास साटम यांनी व्यक्त केला. गेली २५ वर्षे महानगरपालिकेत सत्तेत राहून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत, मुंबईकरांच्या हितासाठी हा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असे त्यांनी सांगितले. धनुष्यबाण आणि कमळ हे एकाच ध्येयासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना साटम म्हणाले की, गंभीर आरोप असलेल्या व्यक्तींशी कोणतेही संबंध ठेवले जाणार नाहीत.

