मुंबई/मत चोरीच्या मुद्द्यावर भलेही महाविकास आघाडीने मनसे सोबत मोर्चा काढलेला असला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे.कारण मनसेची परप्रांतीय विरोधी भूमिकेचा काँग्रेसला बिहार निवडणुकीत फटका बसू शकतो म्हणूनच महाराष्ट्र काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेला सोबत न घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.तर उद्धव ठाकरे मनसेबाबत आग्रही असल्याने ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवतील असे दिसते त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून पुढील काळात राजकीय घडामोडी पाहायला मिळतील. त्यामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती राहिल का नाही, महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढवणार का नाही, हेही पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. त्यातच, मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदार नोंदणीवरुन निवडणूक आयोगावर जोरदार टीका होत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे हेही आयोगावर टीका करत महाविकास आघाडीसोबत असल्याचे दिसून येते. मात्र, महाविकास आघाडीमध्ये मनसेला स्थान असेल की नाही, याबाबत काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत यासंदर्भात बैठक झाली असून बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंपासून काँग्रेस एक हात लांबच राहणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना दुसरीकडे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे, सध्या ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज ठाकरे महाविकास आघाडीत येतील, अशी चर्चा जोर धरत आहे , बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेसोबतची युती काँग्रेसला परडवणारी नाही. त्यामुळेच, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत काँग्रेसने मनसेसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ही बैठक ४ नोव्हेंबर रोजी टिळक भवन येथे संपन्न झाली. या निर्णयाची माहिती लवकरच काँग्रेस हायकमांडला दिली जाणार आहे
इंडिया आघाडीत असलेल्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यास काँग्रेस तयार आहे. मात्र, मनसेसोबत कुठल्याही परिस्थितीती आघाडी होणार नसल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. मनसेकडून उघडपणे उत्तर भारतीय आणि अल्पसंख्यांक नागरिकांना लक्ष्य केलं जातं, त्यांच्याविरुद्ध भूमिका घेतली जाते. त्यामुळे, मनसेसोबतची आघाडी पक्षाला परवडणारी नाही. विशेष म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते नुकसानदायक असल्याचंही काँग्रेस नेत्यांचं मत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी नुकतेच निवडणूक आयोगा आणि मतचोरीच्या मुद्द्यावरुन मुंबईत भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात काँग्रेस नेतेही सहभागी झाले होते. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक हात लांबच राहणे पसंत केल्याचं दिसून आलं. त्यामुळे, ठाकरे बंधू एकत्र आले तरी राज ठाकरे महाविकास आघाडीत असतील की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.

