मुंबई, शनिवार : आपल्या प्रभावी शैलीमुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर आपला असाधारण ठसा उमटविणारे पत्रकार पद्मश्री विनोद दुआ यांच्या निधनाने भारतीय पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.
दूरदर्शन आणि एनडीटीव्हीमध्ये काम करत असताना विनोद दुआ यांनी आपली निर्भीड आणि नि:पक्षपाती पत्रकारिता दाखवून दिली. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोक प्रश्न विचारणारे विनोद दुआ हे सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनले. ते स्वत: खवय्ये असल्यामुळे दिल्लीत आणि इतरत्र उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांबद्दल त्यांनी आपल्या कार्यक्रमातून उपयुक्त माहिती दिली. 1996 साली रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक माध्यमातील ते पहिले पत्रकार होते. त्यांच्या निधनाने भारतीय पत्रकारितेतील एक कडा कोसळला आहे, अशा शब्दांत श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी कै. विनोद दुआ यांना श्रद्धांजली वाहिली.
