ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर, गझल तसेच पार्श्वगायक हरिहरन, सेलेब्रिटी शेफ संजीव कपूर, अभिनेत्री सुषमा देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे व बीड जिल्ह्यात एचआयव्ही एड्सग्रस्त मुलांच्या संगोपन व पुनर्वसनासाठी कार्य करीत असलेले दत्ता बारगजे व संध्या बारगजे यांना आज जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १ मे) मुंबई येथे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आफ्टरनून व्हॉइस माध्यमातर्फे आयोजित ‘१८ व्या न्यूजमेकर्स अचिव्हर्स’ पुरस्कार सोहळ्याला ज्येष्ठ भरतनाट्यम विदुषी डॉ संध्या पुरेचा, अभिनेते व जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ भरत दाभोळकर, आफ्टरनून व्हॉईसच्या संपादिका डॉ वैदेही तमन व राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे प्रामुख्याने उपस्थित होते.
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लोकांना सन्मानित केल्यास त्यातून समाजाला प्रेरणा मिळते, असे सांगून जीवन गौरव पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींचे योगदान फार मोठे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना शेफ संजीव कपूर यांनी लोकांना घरचे भोजन नेहमी चांगले असा मूलमंत्र दिला. ‘घरच्या भोजनात प्रेम असते तर बाहेरच्या भोजनात व्यवहार असतो’ असे त्यांनी सांगितले. पार्श्वगायक हरिहरन यांनी यावेळी ‘तू ही रे, तेरे बिना मै कैसे जिऊ’ हे गाणे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
महाराष्ट्राची भूमी प्रगतिशील विचार, सामाजिक सुधारणा आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहे. राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा वारसा लाभला आहे.
आजही महाराष्ट्र उद्योग, संस्कृती, सुशासन आणि सामाजिक विकास या क्षेत्रांत देशाचे नेतृत्व करत आहे, असे सांगून समाज विविध आव्हानांना सामोरे जात असताना प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण या मूल्यांचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. आज सन्मानित होत असलेले सर्व व्यक्तिमत्त्वे या मूल्यांचे जिवंत उदाहरण आहेत, असे राज्यपालांनी सांगितले

