मुंबई : मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी बांग्लादेशी फेरीवाल्यांना हटवण्याची घोषणा करून नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील फेरीवाल्यांची नोंद, परवाने, ओळखपत्रे आणि वास्तव्य कागदपत्रांची तात्काळ तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. येत्या काही दिवसांत खरी कारवाई होईल की प्रशासन केवळ नौटंकी करेल, हे सध्या प्रतीक्षेचे आहे.वाढत्या बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या तक्रारींमुळे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक बोलावली. भाजप नेते किरीट सोमय्या व इतर नगरसेवकही हजर होते. या बैठकीत महापौरांनी आधार कार्डासह शासकीय ओळखपत्रांची काटेकोर पडताळणी, अवैध कागदपत्रधारकांवर कायदेशीर कारवाई आणि महापालिका-पोलिस समन्वय वाढवण्याचे स्पष्ट आदेश दिले.मागील काही वर्षांत मुंबईत फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली असून, त्यात परदेशी नागरिक अवैध व्यवसाय करत आहेत. यामुळे स्थानिक फेरीवाल्यांचा आर्थिक नुकसान होत असून, महिलांच्या सुरक्षेला धोका आणि फुटपाथवरील गर्दीमुळे कायदा-सुव्यवस्था बिघडत आहे. अतिक्रमण हटवून नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे महापौर म्हणाल्या. विविध प्रभागांत तात्काळ कारवाई सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

