नवी दिल्ली/भारतीय जनता पक्षाने गुरुवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींनी ट्रेड डीलवरून सरकारवर केलेले आरोप भाजपच्या खासदारांनी फेटाळून लावले आहेत. त्यानंतर संसदेत राहुल गांधींच्या विरोधात अपात्रता ठराव मांडला. अपात्रता ठराव मंजूर झाल्यानंतर राहुल गांधींना आजीवन निवडणूक लढण्यास बंदी येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात अपात्रता ठराव मांडला आहे. या ठरावात राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करून त्यांना आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी खासदार दुबे यांनी केली. दुबे यांच्या मागणीने विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटलं की, ‘मी आज लोकसभेत राहुल गांधी यांच्या विरोधात अपात्रता ठराव मांडला. राहुल गांधी हे देशाची दिशाभूल करत आहे. मी ठराव मांडलाय, त्यावर चर्चा व्हावी. राहुल गांधी यांचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना आजीवन निवडणूक लढण्यास आजीवन बंदीची मागणी केली आहे’. राहुल गांधी म्हणाले होते की, ‘देश विकून लाज वाटत नाही. अमेरिका भारताचे निर्णय कसे घेऊ शकते? आता युनायटेड स्टेट्स ठरवणार की आपण कोणाकडून तेल खरेदी करावं. युनायडेट स्टेट्स येऊन सांगेल की, आपण कोणाकडून तेल खरेदी करावं. आमचे निर्णय अमेरिका घेईल. आमचे निर्णय पंतप्रधान मोदी घेणार नाहीत’.
राहुल गांधी यांच्या वक्तव्याने संसदेत एकच गदारोळ झाला. राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे

