श्रीनगर: राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी जम्मू आणि काश्मिरातील दहशतवादी गटांवर कारवाई तीव्र केली असून काश्मीर खोऱ्यातील बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीशी (जेईआय) संबंधित ३०० हून अधिक ठिकाणी छापेमारी केली.
जेईआयशी संबंधित घटक वेगवेगळ्या आघाड्यांवर पुन्हा कारवाया सुरू करण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय गुप्तवार्ता पोलिसांना मिळाली होती. याआधारे हे छापे घालण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. कुलगाम, पुलवामा, शोपियाँ, बारामुल्ला आणि गंदरबल जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. ‘जेईआय’चे सदस्य आणि त्यांच्या साथीदारांच्या निवासस्थानी आणि त्यांच्याशी संबधित परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांच्या मुळावरच घाव घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.दक्षिण काश्मिरातील कुलगाम जिल्ह्यात २०० हून अधिक ठिकाणी छापे मारण्यात आले. मागील चार दिवसांत जिल्ह्याच्या विविध भागांत दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या व्यक्ती (ओजीडब्ल्यू), पाकिस्तानातून कारवाया करणारे जम्मू आणि काश्मीरचे निवासी (जेकेएनओपी), याआधी चकमकी झालेली ठिकाणे, सक्रिय; तसेच मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची लपण्याची ठिकाणे आदी ठिकाणी ४०० हून अधिक शोधमोहिमा राबवण्यात आल्या. या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानातून कारवाया करणारे जम्मू आणि काश्मीरचे निवासी; तसेच बंदी घातलेल्या इतर संघटनांशी संबंधित अशा सुमारे ५०० व्यक्तींची चौकशी करण्यात आली. त्यापैकी अनेकांना प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत ताब्यात घेऊन अनंतनाग येथील जिल्हा कारागृह मट्टन येथे हलविण्यात आले आहे.उत्तर काश्मिरातील बारामुल्ला जिल्ह्यात पोलिस व इतर सुरक्षा दलांच्या समन्वयाने सोपोर, झैंगीर आणि रफियाबाद भागात ३० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या सर्व जिल्ह्यांतून आक्षेपार्ह साहित्य आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. ‘जेईआय’च्या अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले.दहशतवादी आणि फुटीरतावादी गटांना मदत करणारी व्यवस्था उद्ध्वस्त करणे, दहशतवाद्यांचे वैचारिक, आर्थिक आणि रसदपुरवठा करणारे गट नेस्तनाबूत करणे आणि शांतता अबाधित राहील याची खात्री करणे या उद्देशाने जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सातत्यपूर्ण प्रतिबंधात्मक धोरणाअंतर्गत या कारवाया केल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले
