मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी शीव स्थानकाजवळील ११२ वर्षे जुन्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. काम वेगाने पूर्णत्वाकडे जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच अंतिम कामे दर्जेदार ठेवून दुभाजक व पुलाच्या बाजूने हिरवळ किंवा व्हर्टिकल गार्डन उभारण्याचे निर्देश दिले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकेसाठी हा पूल नवीन स्वरूपात बांधण्यात येत आहे. रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाचे काम मध्य रेल्वेमार्फत, तर पोहोचमार्गाचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून केले जात आहे. १ ऑगस्ट २०२४ पासून वाहतुकीसाठी बंद असलेल्या या पुलाच्या दोन्ही गर्डरचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून क्रॅश बॅरिअर व वेअरिंग कोटचे काम सुरू आहे. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी एलबीएस मार्ग आणि संत रोहिदास मार्ग येथील नवीन भुयारी मार्ग आधीच सुरू करण्यात आले आहेत.
निविदेनुसार अंतिम मुदत फेब्रुवारी २०२७ असली, तरी नागरिकांची सोय लक्षात घेऊन ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूल पूर्ण करून लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचा पालिका व रेल्वेचा प्रयत्न आहे. पाहणीवेळी एफ-दक्षिण/उत्तर समिती अध्यक्षा मानसी सातमकर आणि प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे उपस्थित होते.
