मुंबई /गेल्या काही दिवसांत इंडिगो एअरलाइन्सच्या नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कंपनीने काल मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली होती. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. या विरोधात प्रवाशांनी संताप देखील व्यक्त केला होता. दरम्यान, इंडिगोची विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांना १० कोटी रुपयांचा फटका बसला आहे
लगीन सराईच्या हंगामात फुलांची जोमाने मागणी होते. हा काळ फुल उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस घेऊन येतो. मात्र इंडिगो एअर लाईन्सच्या गोंधळाचं विघ्न आलं अन देशातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना १० कोटींचं नुकसान झालं. आपल्या भारतात रोज देशांतर्गत ४० लाख गुलाब फुलांची वाहतूक होते, त्यातील २५ टक्के म्हणजे १० लाख गुलाबांची रोजची वाहतूक ही विमानाने होते. मात्र इंडिगोच्या गोंधळानं ही गुलाबांची फुलं विविध विमानतळांवर पडून आहेत. आज एका गुलाबाला वीस रुपयांचा भाव आहे, हे पाहता १० लाख गुलाबाचे रोजचे दोन कोटी म्हणजे गेल्या पाच दिवसांत १० कोटींचा फटका गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. आता हे नुकसान कोण भरुन देणार? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुलांची शेती आहे. येथील गुलांबाची मोठ्या प्रमाणात निर्यात विविध राज्यांसह परदेशात देखील केली जाते. मात्र, विमान सेवा खोळंबल्यामुळं याचा मोठा फटका शेकऱ्यांना बसला आहे.

