एका अतृप्त आत्म्याने महाराष्ट्राला अस्थिरतेत लोटले – पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल
पुणे : महाराष्ट्रातील एका अतृप्त आत्म्यानं ४५ वर्षांपूर्वी अस्थिरतेत लोटलं त्यानंतर आता देशही अस्थिरतेत लोटण्याचं काम या व्यक्तीकडून केलं जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची रेसकोर्सच्या मैदनावर सभा पार पडली, या सभेत त्यांनी हे विधान केलं आहे.
मोदी म्हणाले, “मी आज जे काही बोलेल ते कोणी व्यक्तीगत आपल्यावर घेऊ नये. काही भटकणाऱ्या आत्मा असतात, ज्यांची इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांची आत्मा भटकत राहते. ज्याचं स्वतःचं काम होत नाही तर ते दुसऱ्यांचं काम देखील बिघडवायला लागतात. आपला महाराष्ट्र देखील अशाच एका अतृप्त आत्मांचा शिकार झाला आहे. आजपासून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्यानं आपल्या महत्वाकांक्षेसाठी या खेळाला सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एक अस्थिरतेच्या काळात ओढला गेला, त्यानंतर अनेक मुख्यमंत्री आपले कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत.
हा आत्मा विरोधकांनाच अस्थिर करत नाही तर काहीही करु शकतो. हा आत्मा आपल्या पक्षातही असं करते, कुटुंबातही असंच करते. सन १९९५ मध्ये जेव्हा भाजप-शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा देखील ही आत्मा सरकार अस्थिर करण्यासाठी काम करत होती. त्यानंतर सन २०१९ मध्ये जनादेशाचा इतका मोठा अपमान केला जे महाराष्ट्राची जनता चांगलं जाणते. पण आज केवळ महाराष्ट्राच नव्हे तर देशात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ ही आत्मा करत आहे. त्यामुळं आज भारताला अशा भटकत्या आत्मापासून वाचवून देशाला स्थिर आणि मजबूत सरकारच्या दिशेनं जाणं गरजेचं आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
![](https://www.mumbaijansatta.com/wp-content/uploads/2024/04/sharad-pawar-attack-on-pm-narendra-modi-1-1024x576.jpeg)