ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

भोगा आपल्या कर्माची फळे ‘ दुसरे काय ? –

३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यामुळे शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील निकटचे सहकारी एकनाथ संभाजी शिंदे यांनी सुमारे ४० आमदार व १० खासदार यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाबरोबर घरोबा केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार होत महाविकास आघाडीची अडीच वर्षाची राजवट संपुष्टात आली. या घटनेच्या बरोबर एक वर्षानंतर अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ ची पुनरावृत्ती करीत पाच वर्षाच्या एका कार्यकाळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार यांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा अत्राम, अनिल पाटील, अदिती तटकरे, संजय बनसोडे या आपल्या सहकाऱ्यांनाही शिंदे फडणवीस सरकार मध्ये सहभागी करुन घेत आणखी एकदा राजकीय भूकंप घडवून आणला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आपल्याला दुहीचा शाप भोवला असल्याचे इतिहासातील पानांवर नजर टाकल्यास दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन मोहिमा फत्ते करीत असतांना महाराजांनाही काही मराठ्यांच्या गद्दारीचा सामना करावा लागला होता. १९५६ साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून आंदोलन झाले. मुंबई प्रांत, बॉम्बे प्रोविन्स चे परिवर्तन केंद्र सरकारकडून मुंबई द्विभाषिक राज्यात करण्यात आले आणि मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा डाव खेळण्यात आला. म्हणून आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, श्रीधर महादेव तथा एसेम जोशी, पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, शाहीर अमर शेख आदींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली. १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र समितीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळून सत्ता समितीच्या हातात येणार त्याचवेळी यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांनी एका बाजूला शेतकरी कामगार पक्षातून यशवंतराव मोहिते आणि शंकरराव मोहिते पाटील यांना कॉंग्रेसमध्ये आणले. महाराष्ट्रात पक्ष फोडण्याची सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नजरेतून उतरु नये आणि काँग्रेसच्या हाती सत्ता यावी म्हणून काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या विदर्भाला महाराष्ट्रात आणण्यासाठी डाव टाकला, त्यात ते यशस्वी सुद्धा झाले. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या हातून सत्ता यशवंतरावांनी जवळपास हिसकावून घेतली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश १ मे १९६० रोजी आणला. परंतु शंकरराव चव्हाण यांनी सचिवालयाचे मंत्रालय करण्यासाठी निर्णय घेण्याआधी या मंगल कलषाऐवजी सहाव्या मजल्यावर पंडित जवाहरलाल नेहरु यांचा अस्थिकलष ठेवण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण हे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकारमध्ये नोव्हेंबर १९६२ मध्ये संरक्षण मंत्री म्हणून रुजू झाले तेंव्हा विधानपरिषदेच्या सभागृहात ग. दि. माडगूळकर यांनी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असे वर्णन यशवंतराव चव्हाण यांच्या अभिनंदनपर ठरावाच्या भाषणात केले. ग. दि. मां. चे हे वर्णन अजरामर झाले. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे ताश्कंद दौऱ्यावर असतांना यशवंतराव चव्हाण त्यांच्या समवेत होते. दुर्दैवाने लालबहादूर शास्त्री यांचे देहावसान झाले. त्यानंतर कामराज, निजलिंगप्पा आदी काँग्रेस नेत्यांनी पुढचे पंतप्रधान हे यशवंतराव बळवंतराव चव्हाण हेच असतील असा ठराव करुनही अपेक्षेपेक्षा ही विनम्रता दर्शविणाऱ्या यशवंतरावांनी त्यांच्या हातातोंडाशी आलेले पंतप्रधानपद दिल्लीच्या चरणी म्हणजेच इंदिरा गांधी यांच्या हाती सुपूर्द केले. मराठी माणूस तिथेच मागे पडला. १९६९ साली बंगळुरुच्या काचघरात काँग्रेस पक्ष फुटला आणि इंदिराजींची इंडिकेट तर मुरारजींची सिंडिकेट अशी काँग्रेसची दोन शकले झाली. पण १९७१ सालच्या बांगलादेश निर्मिती नंतर इंदिरा गांधी अनभिषिक्त सम्राज्ञी बनल्या आणि सत्ताभिलाषी इंदिराजींनी आणीबाणी लादली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांती आंदोलन सुरू झाले. इंदिरा गांधी यांनी जयप्रकाश नारायण, मुरारजी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते आदींबरोबर काँग्रेसचे तरुण तुर्क मोहन धारिया, चंद्रशेखर, कृष्णकांत यांनाही तुरुंगात डांबले. जानेवारी १९७७ ला आणीबाणी उठवून इंदिरा गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुका घोषित केल्या. भारतीय जनसंघ, समाजवादी, भारतीय लोकदल, संघटना काँग्रेस या चार पक्षांचा जनता पक्ष केंद्रात सत्तेत आला तशी पक्षांच्या फाटाफुटीला वेग आला. महाराष्ट्रात वसंतदादा पाटील आणि नासिकराव तिरपुडे यांचे दोन पक्षांचे सरकार १७ एप्रिल १९७७ रोजी आले. दादा मुख्यमंत्री तर तिरपुडे उपमुख्यमंत्री होते. याच मंत्रिमंडळात शरद पवार (वय ३७) हे तरुण राज्यमंत्री होते. त्यांनी दादांच्या सरकार मधून बाहेर पडून १९ जुलै १९७८ रोजी पुरोगामी लोकशाही दल बनवून सरकार स्थापन केले. जनता पक्ष (यात संघाचे लोकही होते), शेतकरी कामगार पक्ष या सर्वात तरुण मुख्यमंत्र्यांच्या सरकार मध्ये सामील झाले होते. शरद पवार यांनी तेंव्हा समांतर काँग्रेस/समाजवादी काँग्रेस स्थापन केली होती. १९७५ साली विदर्भाच्या विरोधात दंड थोपटून मराठवाड्यात मुख्यमंत्री पद खेचून आणणारे शंकरराव भाऊराव चव्हाण यांनी महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस स्थापन करुन आधी मुख्यमंत्री पद भूषविण्याचा मान मिळविलेले पवारांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री पद स्वीकारते झाले. १९८६ साली शरद पवार यांनी काँग्रेसच्या निष्ठावंतांचा विरोध असतांनाही राजीव गांधी यांना औरंगाबाद येथे आणून आपला पक्ष काँग्रेस मध्ये विलीन केला. १९९० साली शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या आधारे केली आणि पहिल्यांदा शिवसेनेचे ५२ आणि भारतीय जनता पक्षाचे ४२ असे ९४ आमदार निवडून आले. बाळासाहेब ठाकरे यांनी डॉ. मनोहर गजानन जोशी यांना विरोधी पक्षनेते केल्यामुळे संतप्त झालेल्या छगन चंद्रकांत भुजबळ यांनी १९९१ च्या डिसेंबरमध्ये १८ आमदारांना घेऊन काँग्रेस प्रवेश केला. सहाजण पुन्हा शिवसेनेत आले त्यातूनही तीन भुजबळांकडे गेले. मग छगन भुजबळ यांना मंडल आयोग, महात्मा फुले यांची प्रकर्षाने याद आली. त्यापूर्वी छगन भुजबळ यांनी रिडल्सच्या मोर्चा नंतर हुतात्मा चौक गोमूत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण केले होते. नथुराम गोडसे यांचे पुतळे उभारण्याची त्यांची भाषणेही प्रसिद्ध झाली होती. १९९९ साली शरद पवार यांनी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्या विदेशी मूळ असल्याचा मुद्दा पुढे करत पूर्णो संगमा, तारीक अन्वर यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. नंतर संगमा आणि अन्वर यांनी पवारांची साथ सोडली. १९९९ सालीच विधानसभा निवडणुकीत शिवसेना भारतीय जनता पक्ष युती पुन्हा सत्तेवर येऊ शकली नाही आणि मुख्यमंत्री पद मिळू शकत नाही म्हणून अस्वस्थ झालेल्या नारायण तातू राणे यांनी जुलै २००५ मध्ये शिवसेनेबरोबर काडीमोड घेत काँग्रेस प्रवेश केला. २००६ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे स्वरराज श्रीकांत ठाकरे उर्फ राज ठाकरे यांनी काकांची साथ सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नांवाने सवतासुभा उभा केला. दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे यांनीही आपले काका गोपीनाथराव मुंडे यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षाच्या कमळाऐवजी पवार काकांचे घड्याळ हाती बांधले. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे या काका पुतण्या पाठोपाठ बीड जिल्ह्यात जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या काका पुतण्यांमध्ये बंडाळी पाहिल्यावर आता २३ नोव्हेंबर २०१९ या दिवशी शरद पवार यांच्या अजीतदादा पवार या पुतण्याचेही बंड पहायला मिळाले. खरंतर अजीत पवार आणि शरद पवार यांच्या आपापसातील भिन्न भूमिका महाराष्ट्रात नजीकच्या काळात पहायला मिळाल्या आहेत. शरद पवार यांनी इवीएम ला विरोध केला तर त्यांच्या सुकन्या सुप्रिया सुळे निवडून आल्या. अजीत पवार यांनी इवीएमला विरोध केला नाही पण त्यांचे सुपूत्र पार्थ पवार यांना पराभव पत्करावा लागला. शरद पवार यांनी पार्थच्या उमेदवारीला आधी विरोधही केला होता. ईडीच्या प्रकरणात शरद पवार यांच्या समर्थनार्थ राजीनामा देऊन डोळ्यात आसवं न थांबणारे अजीतदादा आपण पाहिले. पण अखेर सहनशीलता संपली, चर्चेचे गुऱ्हाळ संपत नसल्याने कंटाळा आला म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याचा निर्णय घ्यावा लागला, असे सांगत अजीतदादा या पवारकाकांच्या पुतण्याने २३ नोव्हेंबर २०१९ रोजी बंड केले. २०१४ आणि २०१९ या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षांतराचे फुटलेले पेव राज्याच्या जनतेने पाहिले आणि अनुभवले आहे. या सर्वच पार्श्वभूमीवर एकच म्हणावे लागेल की, ‘जसे पेरले तसे उगवले !’ महाराष्ट्राला दुहीचा शाप भोवतोय की हा शाप वरदानात परिवर्तित होईल, याचे उत्तर काळाच्या उदरात दडलेले आहे. ब्रिटिशांनी जी फोडा आणि झोडा ही नीति अवलंबली, त्याची फळे आपण भोगतोय. ‘भोगा आपल्या कर्माची फळे ‘ दुसरे काय ? -योगेश वसंत त्रिवेदी,

error: Content is protected !!