शिक्षणमंत्र्यांची शिष्टाई अपयशी – हिंदी विरुद्ध मनसेने रणशिंग फुंकले! ५ जुलैला भव्य मोर्चा
मुंबई :पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय असावा. ही सरकारची भूमिका राज ठाकरे यांना मान्य नसल्याने, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि राज ठाकरे यांची भेट निष्फळ ठरली.आता मनसे हिंदी विरुद्ध आरपारची लढाई लढणार असून, ५ तारखेला हिंदीच्या विरोधात भव्य मोर्चा काढणार आहे.
राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणत अप्रत्यक्षपणे हिंदी भाषेची सक्ती करण्यात येत असल्याचा दावा करत राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाला मनसेनं थेट विरोध केला. त्यानंतर, राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत आज शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी आम्हाला शासनाची भूमिका अजिबात मान्य नाही. सरकारने पटवून देण्याचा विषयच येत नाही, आम्हाला भूमिका मान्य नाही असे राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहनही राज ठाकरेंनी केले आहे. तर, ५ जुलै रोजी मराठी माणसांचा हा मोर्चा गिरगावहून निघेल, अशी घोषणाही राज ठाकरेंनी केली.
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आता येऊन गेले त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मी पूर्णपणे भूमिका फेटाळून लावली असून आम्हाला हे मान्य नसल्याचे सांगितले. खरतर ५ वी नंतरच पर्यायी भाषेचा मुद्दा आहे, त्यांना हेही सांगितले की नेपमध्ये असे काही नाही हे राज्यांवर टाकले आहे, मग ते का करत नाहीत, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. तर, सीबीएसई या शाळा आल्या त्या आयएएस अधिकाऱ्यांसाठी काढण्यात आल्या आहेत. त्या शाळेच वर्चस्व करण्याचे सुरू आहे आणि महाराष्ट्र हे का करत आहे? बाकी राज्य काही अशी भूमिका घेत नाही. आमचा या संपूर्ण प्रकरणाला विरोध आहे, असेल आणि राहणार असल्याचेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.हिंदी असेल किंवा इतर कोणत्या ही भाषेची सक्ती राहणार नाही. मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की, येत्या ५ जुलैला आम्ही गिरगाववरून मोर्चा काढायचे ठरवरलं आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मोर्चा असेल, आम्ही सर्वांना या मोर्चाचे आमंत्रण देत आहोत. त्यामुळे, ५ जुलै रोजी सकाळी 10 वाजता हा मोर्चा असेल, मी रविवारी निवडला आहे कारण सर्व येऊ शकतील, हा मोर्चा गिरगाव ते आझाद मैदान असा असेल. मी बाकीच्या पक्षासोबत बोलणार आहे, अशी घोषणाच राज ठाकरेंनी यावेळी केली. तसेच, महाराष्ट्राचं मराठीपण घालवायचा हा कट आहे, मी कट बोलतोय कारण हा कटच आहे, असेही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
