आयपीएल मधील बंगळुरू संघाच्या विजयोत्सवात – चेंगराचेंगरी होऊन 11 ठार
कर्नाटक सरकारकडून न्यायालयीन चौकशीच्या आदेश
बंगळुरू/आयपीएलच्या अंतिम फेरीत पंजाबचा पराभव करून, तब्बल १८ वर्षांनी आयपीएल चषक जिंकणाऱ्या ,आर सी बी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा बंगळुरू मध्ये विजय असो साजरा सुरू असताना, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जमलेल्या क्रिकेट प्रेमींमध्ये चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, कर्नाटक सरकारने या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख देण्याची घोषणा केली आहे.
बंगळुरू:रॉयल चॅलेजंर्स बंगळुरुच्या आयपीएल विजेतेपदाच्या जल्लोषाचं साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येनं चाहते चिन्नास्वामी स्टेडियमजवळ पोहोचले होते. अनियंत्रित गर्दीमुळं झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला. तर, काही जण जखमी आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी लोकांच्या गर्दीमुळं चेंगराचेंगरी झाली. कर्नाटक सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. सरकार जखमींवर मोफत उपचार करणार आहे. आम्हाला या घटनेचं राजकारण करायचं नाही. मी या घटनेच्या न्यायिक चौकशीचे आदेश दिले आहेत. 15 दिवसात रिपोर्ट देण्याचे आदेश दिल्याचं ते म्हणाले.
मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी एक्स पोस्टवर करुन म्हटलं की, बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमुळं काही लोकांचा मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले. ही घटना दु:खदायक आहे. याघटनेमुळं विजयाचा आनंद संपला आहे. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असं सिद्धारामय्या म्हणाले.
अशा प्रकारची चेंगराचेंगरी आणि गर्दी अनिंयत्रित होऊन अशा अप्रिय घटना होण्याची शक्यता असल्यानं टीमच्या विजय परेड करण्यास मंजुरी देण्यात आली नव्हती. माझ्या संवेदना ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती आहेत. जनतेला आवाहन करतो की ते या स्थितीला समजून घ्या. प्रेम आणि स्नेहानं जीवन जगत असताना सुरक्षेला प्राधान्य द्यावं, असं सिद्धारामय्या म्हणाले.
भाजप आणि जेडीएसनं या प्रकरणी कर्नाटकमधील राज्य सरकारला जबाबदार ठरवत टीका केली. कर्नाटक भाजपानं एक्सवर पोस्ट करुन म्हटलं की, 7 लोकांचा मृत्यू झाला, काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळं चेंगराचेंगरी होऊन काही लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. कोणती पायाभूत व्यवस्था नव्हती. फक्त अराजकता होती, निर्दोष लोक मारले गेले. सिद्धारमय्या आणि डीके शिवकुमार क्रिकेटर्ससोबत रील शूट करण्यात आणि प्रसिद्धीच्या झोतात येण्यात व्यस्त होते. हा बेजबाबदारपणा असून काँग्रेस सरकारचे हात रक्तानं माखलेले आहेत, असा आरोप भाजपनं केला.
जेडीएस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी देखील सिद्धारामय्या सरकारवर टीका केली. तयारीमध्ये चूक, आवश्यक उपाययोजना न केल्यानं चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली. काँग्रेस सरकारनं या घटनेची पूर्ण जबाबदारी घ्यावी. मृतांच्या कुटुंबीयांना तातडीनं मदत द्यावी, जखमींवर चांगले उपचार करावेत, असं कुमारस्वामी म्हणाले.
