भुजबळांना मंत्रीपद! कही खुशी काही गम – ओबीसीना आनंद तर मराठा आंदोलक नाराज
मुंबई/ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यामुळे, ओबीसी समाजामध्ये जल्लोष सुरू झाला आहे. तर मराठा आंदोलन संतप्त झाले आहेत. अजित पवार यांना भुजबळना मंत्रीपद देण्याची किंमत चुकवावी लागेल. असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर भुजबळांच्या विरोधात अंजली दमानिया पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची अखेर मंत्रिपदी वर्णी लागली आहे, त्यामुळे ओबीसी समाजात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे.आता ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याची कोणाची हिंमत होणार नाही .अशी प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे. भुजबळांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात पुन्हा एकदा बहुमतानं महायुतीचं सरकार सत्तेत आलं, मात्र त्यावेळी भुजबळ यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती, त्यानंतर जहा नही चैना वहा नही रहना अशी नाराजी भुजबळांनी व्यक्त केली होती. भुजबळ यांच्या ऐवजी माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळलं होतं. मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज होते, त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघड व्यक्त केली होती. पण संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद गेल्यानंतर त्यांच्या जागी भुजबळांना संधी मिळाली आहे.
मंत्रीपद मिळाल्यामुळे भुजबळांची नाराजी जरी दूर झालेली असली, तरी मराठा आंदोलन मात्र चिडलेले आहेत. मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी तर भुजबळांना मंत्रिपद देण्याची अजित पवार यांना किंमत चुकवावी लागेल ,असा इशारा दिला आहे. दरम्यान महायुतीतही आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा नवा वाद निर्माण झाला आहे .कारण पालकमंत्री पदासाठी दादा भुसे ,गिरीश महाजन, आणि आता छगन भुजबळ यांच्या चुरस असेल त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार आहे
भुजबळांना मंत्रिपद दिल्याने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे संतप्त झाले आहेत.जे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहेत, त्यांना सरकारमध्ये मंत्रिपद दिलं जात आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्याने छगन भुजबळांना तात्पुरता आनंद दिला असेल. छगन भुजबळांच्या आनंदावर शंभर टक्के विर्जन पडेल. अजित पवार जातीयवादी लोकं पोसण्याच काम करत आहेत, याची किंमत त्यांना मोजावी लागेल अशी टीका त्यांनी यावेळी केली.छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊ नका असा विरोध अजित पवारांच्या सगळ्या आमदारांनी करायला पाहिजे होता. भुजबळांना मंत्रिपद देण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असू शकतात असंही मनोज जरांगे यांनी टीका केली
दरम्यान छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सातत्याने आवाज उठवणाऱ्या, आणि भुजबळ यांच्या विरुद्ध न्यायालयीन लढाई लढणाऱ्या, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही संताप व्यक्त केला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना दुसरा कोणी सापडला नाही का ? भुजबळ यांनाच मंत्रीपद का देण्यात आले? असे प्रश्न त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना केले आहेत. त्यामुळे भुजबळांचे मंत्रिपद वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कोट्यातून छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाले आहे. परंतु त्यांच्या या मंत्रिपदामुळे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा चिघळणार आहे. कारण नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपाचे गिरीश महाजन, शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे, आणि आता अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे तीन मंत्री दावेदार आहेत. भुजबळ यांना मंत्रीपद देण्यास महायुतीतील काही नेत्यांचा विरोध होता. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आले. पण त्यांच्या मंत्रिपदावरून आता महायुतीतच बेबनाव सुरू होणार आहे.
