ऑपरेशन सिंदूरच्या यशाची अखेर कबुली स्वतःच्याच डोझियारमुळे पाकिस्तान तोंडघशी
इस्लामाबाद: ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतानं बेचिराख केलेल्या तळांची माहिती भारतीय सैन्याकडून देण्यात आली. पण प्रत्यक्षात भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईची तीव्रता अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या अधिकृत डोझियरमधूनच या माहितीचा उलगडा झाला आहे.
पाकिस्ताननं ऑपरेशन बुनयान उन-मरसूसवर डोझियर जारी केलं आहे. ‘भारतीय सैन्य दलांनी सांगितलेल्या ठिकाणांपेक्षा किमान ८ जास्त ठिकाणांवर हल्ले झाले,’ असल्याचा उल्लेख डोजियरमध्ये आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरची तीव्रता आणि त्या माध्यमातून झालेलं पाकिस्तानचं नुकसान अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे. याच कारणामुळे पाकिस्ताननं भारताकडे युद्ध थांबवण्याची विनंती केली. यानंतर भारतानं शस्त्रसंधी करत संघर्ष थांबवला.
पंजाबमधील गुजरात, गुजरांवाला, भवालनगर, अटक आणि चोरमध्ये हल्ले झाल्याची माहिती नकाशाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्यानं एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात सैन्याकडून लक्ष्य करण्यात आलेल्या ठिकाणांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये या ठिकाणाचा उल्लेख नव्हता. याचा अर्थ भारतानं केलेल्या कारवाईची तीव्रता बरीच अधिक होती. दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केल्याचं भारताकडून सांगण्यात आलं. यानंतर आता पाकिस्तानच्या डोजियरमध्ये आणखी ८ ठिकाणांचा उल्लेख आहे
पहलगाममधील २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत २६ निष्पाप नागरिकांचा जीव घेतला. यातील बहुतांश जण पर्यटक होते. पहलगामचा बदला घेण्यासाठी ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर हाती घेण्यात आलं. भारतीय सैन्यानं आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननं भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचे प्रयत्न केले. पण भारतानं बहुतांश हल्ले हाणून पाडले.
