लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला- विरोधकांचा आरोप
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महायुती सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च होत होत आहेत. महायुती सरकारने या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केले होते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याबद्दलची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील हा मुद्दा लावून धरला होता. पाठोपाठ आता लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी कल्याण विभागाचे ३३५ कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वळवल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. तसेच, आदिवासी समाजातून नाराजीचा सूर उमटत आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची टीका सातत्याने होत आहे. ही योजना चालू ठेवण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा दुसऱ्या विभागाचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवल्याची चर्चा आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, “महायुतीच्या नेत्यांचं हे राज्य चालवण्यापेक्षा, सरकार चालवण्यापेक्षा योजनेकडे अधिक लक्ष आहे”. तर, कुठलाही निधी वळवला नसल्याचं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
निधी वळवण्याऐवजी राज्याचं उत्पन्न वाढवा : रोहित पवार
रोहित पवार म्हणाले, “राज्यातील बहुसंख्य आदिवासी जनता दुर्गम भागात राहते. तिथे आजही रस्ते नाहीत, पुरेशा आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत. यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेऊन आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे वेगळा निधी आरक्षित करून समाजासाठी वापरण्यात यावा असा निर्णय घेतला होता. त्यासंबंधीचा आदेश त्यांनी ३० वर्षांपूर्वी काढला होता. मात्र आता तो निधी इतरत्र वळवला जात आहे. त्यामुळे कृपा करून निधीची अशी वाळवावळवी करू नका अशी विनंती मी सरकारला करेन. निधी वळवण्याऐवजी राज्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला मी सरकारला देईन”.
राज्य सरकारचं स्पष्टीकरण
यावर स्पष्टीकरण देताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावकुळे म्हणाले, “लाडकी बहीण योजनेसाठी वेगळं बजेट तयार करण्यात आलं आहे. आदिवासी समाजाचं बजेट वेगळं आहे. तर, सामाजिक न्याय विभागासाठी वेगळं बजेट आहे. त्यामुळे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पैसे करता येत नाहीत. अशा प्रकारच्या काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारची बदनामी करण्यासाठी केलेलं हे कारस्थान आहे”.
प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते प्रफुल पटेल म्हणाले, “काही लोकांना खोटे आरोप करण्याची सवय झाली आहे. आमचं सरकार लाडकी बहीण योजना पूर्ण पाच वर्षे राबवणार आहे. तसेच येत्या काळात लाडक्या बहिणींना १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्याचा आमचा प्रस्ताव आहे. लवकरच आमचं सरकार या प्रस्तावाला मान्यता देईल”.
